१९६०चं दशक- 'असो' ह्या शहाण्यांनी संपादित केलेल्या अनियतकालिकावरचं चित्र. बाळ ठाकूरांनी काढलेलं.

Saturday, October 23, 2010

शहाणे नावाचा 'वेडा'!

- जयंत पवार

(शहाण्यांची पंच्याहत्तरी त्यांच्या मित्रमंडळींनी साजरी केली ७ फेब्रुवारी २०१०ला. त्यानंतर ९ फेब्रुवारीला 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये प्रसिद्ध झालेला हा मजकूर. साभार इथे.)

अशोक शहाणे सात फेब्रुवारीला पंच्याहत्तर वर्षांचे झाले, हे विधान बुचकळ्यात टाकणारं आहे. म्हणजे ते जन्मनोंदीने झालेही असतील पंच्याहत्तर वर्षांचे, पण गेली कित्येक वर्षं, जे त्यांना पाहताहेत त्यांना ते पंच्याहत्तरीचेच वाटत आले आहेत. आणि त्यांचा प्रत्येक विषयाचा व्यासंग आणि त्यावर बोलण्याचा धबाबा उत्साह तर विशी-बाविशीच्या तरुणाचा आहे. म्हणजे शहाणे एकाचवेळी किमान दोन वयांमध्ये वावरत आलेत.

परवा गोरेगावच्या नंदादीप शाळेत त्यांच्या मित्रांनी त्यांना एका जागी चार-साडेचार तास जखडून ठेवलं आणि त्यांना आवडत नसताना त्यांच्या पंच्याहत्तरीचा अनौपचारिक सोहळा साजरा केला. शहाणेंचा वाढदिवस म्हटल्यावर भालचंद्र नेमाडे, राजा ढाले, चंद्रकांत पाटील, अरुण खोपकर, रामदास भटकळ, शांता गोखले, जयंत धर्माधिकारी, सुनील दिघे असे बरेच जण आले. नाही नाही म्हणता सत्तर-ऐंशी शहाणेमित्र जमले!

अशा कार्यक्रमात उत्सवमूर्तीबद्दल भरभरून आणि भडभडून बोलायची स्पर्धा लागते, ज्याची शहाणेंना पहिल्यापासून अ‍ॅलर्जी. त्यांना वि. पु. भागवत पुरस्कार मिळाला तेव्हा पुरस्कारप्रदान समारंभात त्यांच्याबद्दल बरंच बोललं गेलं. विशेष म्हणजे श्री. पु. भागवतही अचानक आणि खूप चांगलं बोलले. सत्काराला उत्तर देताना शहाणे म्हणाले, 'हे सगळं ऐकून मला वाटलं, मी मेलो की काय! थोडी विशेषणं मी मेल्यानंतर वापरायला राखून ठेवा.'

ह्याच पुरस्काराचं मानपत्र सुनील कर्णिकांनी लिहिलं होतं. शहाणेंना ते कसं वाटलं हे त्यांच्या तोंडूनच ऐकण्याची कर्णिक वाट बघत होते. शहाणेंनी आधी कर्णिकांना सणसणीत शिवी घातली आणि मग म्हणाले, 'अरे तो पुरस्कार 'प्रास' प्रकाशनाला आहे, व्यक्तिगत मला नाही. हा माझा जीवनगौरव नव्हे. तो मी मेल्यानंतर करा.' त्यावर तितक्याच खडूसपणे कर्णिक म्हणाले, 'तो तर आम्ही करूच, पण तोवर आम्हीच राहिलो नाही तर पंचाईत व्हायची म्हणून तो आताच केला.'

तर असे हे शहाणे. त्यांचे मित्र तरी कसे सरळ बोलतील? एक चंद्रकांत पाटील सोडले तर सगळे चिमटे घेत, गुद्दे मारतच बोलले. पाटील म्हणाले, 'महाराष्ट्रात बुद्धिमान लोकांनी एकत्र न राहण्याची परंपरा आहे. प्रत्येकाला वाटतं, आपण वेगळं काही तरी करावं. त्यामुळे आम्ही पुढे सगळे वेगवेगळे झालो. पण अशोक हा एकमेव माणूस आम्हा सगळ्यांशीच दुवा ठेवून होता.' शहाणे हे लिटिल मॅगझिन चळवळीचे पायोनियर. 'असो' हे लघुअनियतकालिक त्यांनी आणि नेमाड्यांनी सुरू केलं. मग 'आता' काढलं. 'असो'चे पाच अंक विकत घेतल्यावर 'आता'चा एक अंक फुकट मिळेल, अशी जाहिरात केली. 'मराठी साहित्यावर क्ष किरण' लिहून शहाण्यांनी साहित्यसृष्टीवर बॉम्बच टाकला. त्यात महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांबद्दल त्यांनी जे लिहिलंय ते वाचून अनेकांची फे फे झाली. नेमाडे म्हणाले, 'आम्ही दोघांनी पुणं सोडलं आणि लगेच पानशेतचं धरण फुटलं, हे प्रतिकात्मक अर्थानेच घ्यायला पाहिजे.' 'कोसला'मध्ये 'ते दोघे आले' असे वारंवार उल्लेख येतात, ते दोघं म्हणजे शहाणे आणि त्यांचे कपूर नावाचे एक मित्र होत, हे नेमाडेंनी सांगून टाकलं.

शहाण्यांनी आयुष्यभर जो वेडेपणा केला तो भल्याभल्यांना जमला नाही. समाजाचा तोल राखण्यासाठी प्रत्येक काळात असे वेडे शहाणे असावेच लागतात. आपल्यात एक तरी असा आहे.

No comments:

Post a Comment

मैत्र