१९६०चं दशक- 'असो' ह्या शहाण्यांनी संपादित केलेल्या अनियतकालिकावरचं चित्र. बाळ ठाकूरांनी काढलेलं.

Monday, October 11, 2010

ग्रंथनिर्मितीचे 'शहाणे' कवतिक

- सुनील कर्णिक

('दिव्य मराठी'च्या 'रसिक' ह्या रविवारच्या पुरवणीमध्ये १०.७.११ रोजी प्रसिद्ध झालेला लेख.)



पुस्तके कशी तयार होतात, याचे सुप्त कुतूहल अनेक वाचकांच्या मनात असते. त्याविषयीची एक खास चर्चा मुंबईतल्या ‘संवाद’ संस्थेने २१ जूनच्या संध्याकाळी प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात ठेवली होती. व्याख्याते होते प्रास प्रकाशनाचे चालक अशोक शहाणे. वय वर्षे ७५. ते अनुवादक, भाष्यकार, संतप्त साहित्यिकांचे मठाधिपती, आदी विशेषणांनी प्रसिद्ध आहेतच; पण त्यांनी मुद्रणालयांत काम केले आहे आणि त्यांच्या प्रास प्रकाशनाच्या पुस्तकांची निर्मिती अत्यंत लक्षवेधक असते. म्हणूनच त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी शंभर-एक चोखंदळ वाचक आवर्जून उपस्थित होते. शहाण्यांचे व्याख्यान सणसणीत, खणखणीत आणि अत्यंत ऐकण्याजोगे असणार याबद्दल त्या सर्वांची जणू खात्री होती. शहाण्यांनी अर्थातच त्यांची निराशा केली नाही. ते म्हणाले : ‘पुस्तकं छापणं हे तसं सोपं काम असतं. छापखानेवाले असतातच; त्यांच्याकडे हस्तलिखित नेऊन दिलं की पुस्तक छापून मिळतं. पण हा सरधोपट मार्ग झाला. आता बोरिवलीला शब्द प्रकाशन आहे. ते ‘मुक्त शब्द’ नावाचा अंक काढतात. त्याचं हस्तलिखित मौज प्रेसमध्ये नेऊन दिलं की झालं. मग त्यात प्रकाशकाचा आणखी काही सहभाग नाही. आपले पॉप्युलरपासूनचे सर्व प्रकाशक असे आहेत. हस्तलिखिताला धरून नेमकं काय करावं हे कोणालाच कळत नाही. त्यामुळे त्यांची सगळी पुस्तकं सारखी दिसतात. पण आम्ही असे छापाचे गणपती तयार करत नाही. आमचा प्रत्येक गणपती हाताने तयार केलेला असतो.
खरं म्हणजे प्रत्येक हस्तलिखिताचं छापील स्वरूप आधी प्रकाशकाच्या डोक्यात तयार व्हावं लागतं. मग बाकी सगळी हमालकी असते. हस्तलिखितापासून पुस्तक तयार होईपर्यंत कामांची प्रचंड साखळी असते. दरेक टप्प्यामध्ये आपल्या डोक्यामधल्या पुस्तकाचा शार्पनेस कमी होत जातो. आमचे मुद्रक मित्र कृष्णा करवार म्हणायचे तसं - पुस्तकाचं बाळंतपण करावं लागतं. त्यात शाईबरोबर थोडा जीव घालावा लागतो.
पुस्तकाची निर्मिती म्हणजे टीमवर्क असतं. त्यात डझनभर लोकांचा हात लागलेला असतो. उगाच प्रकाशकांनी मिरवू नये. काम बिघडवण्याचे सर्वाधिकार मुद्रकाकडे असतात. बाइंडर हा आधीच्या सर्व कामावर पाणी फिरवू शकतो हे इतरांनी लक्षात ठेवावं. साध्या अंकलिपीचा विचार गेल्या दीडशे वर्षांत आपण केलेला नाही. क ख ग घ ङ् हा अक्षरांचा गट कोणी पाडला? तर बहुधा छापखान्याच्या फोरमनने. पण मराठीत छापलेली पहिली अंकलिपी आपण जतन केलेली नाही. आता पुस्तकाच्या कागदाचं पाहूया. बाजारात काही आकारांचे कागद मिळतात. डेमी, क्राउन, रॉयल, फुलस्केप वगैरे. कागदाच्या मोठ्या रिळातून ते कापून काढावे लागतात. ‘ग्रंथ’ म्हणजे ‘गाठ मारलेले, बांधलेले’ कागद. लिहिलेले किंवा छापलेले कागद बांधून काढले की त्यांचा ग्रंथ होतो.
छापलेल्या मोठ्या कागदाची ४ च्या पटीत घडी घालतात. म्हणून १६ पानांचा फॉर्म. यंत्रावर तशी रचना करण्यासाठी पूर्वीच्या छापखान्यामध्ये ठरावीक लाकडी फर्निचर असे. आपण १२ पानी फॉर्मचा आग्रह धरला की मुद्रकाला ते फर्निचर तोडावं लागे, म्हणून तो अशी वेगळी रचना करायला नाखूष असे. पण ‘अरुण कोलटकरच्या कविता’ छापताना अम्ही पुस्तकाचा वेगळा आकार नक्की केला. कसा? तर त्यातल्या सर्वात मोठ्या ओळीची लांबी मोजली. त्यावरून पुस्तकाची रुंदी ठरली. मग प्रत्येक कविता जास्तीत जास्त दोन पानांतच बसली पाहिजे हे नक्की केलं. त्यावरून पुस्तकाची उंची ठरली. आता या आकारासाठी कागदाचा ३६ पानी फॉर्म सोयीचा होता. पण त्याचं बार्इंडिंग करता येईल का, ही शंका होती. पण तेही जमेल असं दिसलं. मग त्याप्रमाणे पुस्तक आकाराला आलं.
पण ‘मौजे’च्या विष्णुपंत भागवतांना आम्ही हे सांगितलं तर ते म्हणाले, ३६ पानी फॉर्म होईल कसा? तर तो होतो. आपण हवे तेवढे आकार करू शकता. पण हे फार कोणाच्या डोक्यात आलेलं दिसत नाही. अर्थात त्यातही काही गैर नाही.
‘भिजकी वही’, ‘माझी कहाणी’, ‘जेजुरी’ अशा आमच्या प्रत्येक पुस्तकाची स्वतंत्र कहाणी आहे. ‘भिजकी वही’चं मुखपृष्ठ आम्ही काळ्या रंगात छापलेलं आहे. आतल्या ‘आसपास’च्या एन्ड पेपरचा कागदही काळा आहे. त्या पुस्तकाचे गठ्ठे बांधणा-या   प्रेसमधल्या माणसाला राहवेना म्हणून तो म्हणाला, ‘काय दिसतंय पुस्तक!’ असं साध्या वाचकांनी पुस्तकाचं डिझाइन वाचायला शिकलं पाहिजे. पण त्याची सौंदर्याची दृष्टी वाढावी म्हणून विशेष प्रयत्न केले जात नाहीत. डिझाइनची दृष्टी असलेले लेखकही फार कमी आहेत.
आपले प्रकाशक पुस्तकाचा मजकुराजोगता चेहरा शोधून काढत नाहीत. तशी पुस्तकाची मांडणी कैक प्रकारांनी करता येते. पण ती एका वेळी एकाच प्रकाराने करावी लागते. ती दगडावरची रेघ आहे. कव्हरमुळे पुस्तक अजिबात ठरत नाही. कव्हर हे बासन असतं. तो दर्शनी चेहरा असतो. आतील मजकूर हे पुस्तक असतं. कव्हर आणि मजकूर यांत साम्य असायला हवं. काही प्रमाणात एकसंधपणा हवा. असा प्रयत्न जाणूनबुजून केल्याशिवाय काही होत नाही.
तसा भाषा आणि लिपी यांचा फार विचार मराठी लोकांनी केलेला नाही. आता अक्षरजुळणीसाठी मराठीत ३५०-३७५ कॅरॅक्टर्स आहेत, तर इंग्रजीत ती शंभरच आहेत. (म्हणून मराठी अक्षरजुळणीसाठी जास्त पैसे मोजावे लागतात) सावरकरांनीसुद्धा वेगळी लिपी शोधून काय केलं, तर मराठीतली ३-४ कॅरॅक्टर्स कमी केली. त्यांच्यासारख्याला स्वर आणि व्यंजन यांच्या विभागणीतलं गमकच कळू नये हे आश्चर्यकारक आहे. मला ते सगळं काम सेन्सलेस वाटतं.
आपण आता ‘आयटी’च्या क्रांतीच्या बढाया मारतो, ते खोटं आहे. अजून शब्द, अक्षर यांची व्याख्या कॉम्प्युटरला समजावून सांगणं आपल्याला जमलेलं नाही. खरं म्हणजे काळ्यावरचं पांढरं अक्षर वाचायला उत्तम असतं. पण त्याच्यासाठी शाई बरीच खर्च होते, म्हणून तसं केलं जात नाही. आम्ही सर्वाधिक कवितासंग्रह छापले. आमच्या ‘प्रास’च्या पुस्तकांना इंग्लंड, अमेरिका, फ्रान्समधल्या प्रकाशकांनीही दाद दिली आहे. कारण त्यांची पुस्तकं स्वत:चा चेहरा घेऊन येत नाहीत. ती एकसारखी दिसतात. खरं तर प्रत्येक पुस्तक स्वत:चं अंग घेऊन जन्माला येत असतं.अशा अनेक कारणांमुळेच मराठीला आज वाईट दिवस आहेत. मराठीतलं इतरांचं एकही पुस्तक मला आजवर आवडलेलं नाही. पण असं बोलणं म्हणजे बढाया मारल्यासारखं होतं; म्हणून बोलायचं नाही.’

1 comment:

मैत्र